जनतेला पाणी न देणाऱ्यांना पाणी पाजा रामकृष्ण वेताळ; शामगावमध्ये बैठक व रॅलीला प्रतिसाद

जनतेला पाणी न देणाऱ्यांना पाणी पाजा
रामकृष्ण वेताळ; शामगावमध्ये बैठक व रॅलीला प्रतिसाद
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
हणबरवाडी, धनगरवाडी योजना हे स्वर्गीय पी. डी. पाटील साहेबांचे स्वप्न होते. पंरतु, पंचवीस वर्षे आमदार, त्यापैकी अडीच वर्षे मंत्री असूनही ज्यांना स्वताच्या वडिलांचे स्वप्न त्यांना पूर्ण करता आले नाही. जे शामगावला पाणी देवू शकले नाहीत, त्यांना आता जनतेनेच पाणी पाजावे, असे आवाहन भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांनी केले.
शामगाव (ता. कराड) येथील भाजप महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उमेदवार मनोजदादा घोरपडे, शेतकरी संघटनेचे नेते सचीन नवलडे, बाळासाहेब पोळ, राहुल यादव, उध्दव पोळ, तात्यासो पोळ, कृष्णत पोळ, डॉ. सचिन पोळ, सुरेश पोळ, सचिन डांगे, बापूराव पोळ, जगदीश लावंड, अक्षय मेनकुदळे, गणेश मम्हाणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीने शामगावला पाणी दिले :
कराड उत्तरच्या लोकप्रतिनिधींकडे कोणतेही व्हिजन नाही. असले नेतृत्व आपल्याला घरी घालवायचे आहे, असे आवाहन करत मनोजदादा घोरपडे म्हणाले, आजवर शामगावच्या ग्रामस्थांनी पाण्यासाठी खूप झळा सोसाव्या लागल्या आहेत. ग्रामस्थांनी पाहण्यासाठी आंदोलन केल्यावर विद्यमान आमदारांनी हात वर केले. तसेच तुम्हाला जे पाणी देतील, त्यांच्याकडून जाण्याचा असा सल्ला दिला. मात्र, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही पदावर नसताना शामगावला पाणी आरक्षित करुन घेतले. ते पाणी शामगावच्या शिवारात खेळवायचे आहे. त्यासाठी कराड उत्तर मध्ये परिवर्तन घडवून महायुतीचा आमदार निवडून आणला पाहिजे. अन्यथा, आरक्षित झालेले पाणी शिवारात येण्यासाठी आणखी 30 वर्षे वाट बघावी लागेल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
आम्हीच पाणीप्रश्न सोडवू :
कराड उत्तरमधील 43 गावांना 25 वर्षांत विद्यमान आमदारांना पाणी देता आले नाही, कशी टीका करत मनोज घोरपडे म्हणाले, दुष्काळी भागातील आजही पाण्यापासून वंचित आसलेल्या गावांना पाणी देण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात आम्हीच कराड उत्तरचा पाणीप्रश्न सोडवू, अशी असा विश्वास आहे त्यांनी यावेळी दिला.
भाजपने पाणीप्रश्न सोडवला :
मनोजदादा हा कराड उत्तरसाठी सक्षम चेहरा असल्याचे सांगत सचिन नलवडे म्हणाले, महायुतीच्या सरकारने कराड उत्तरमध्ये भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे. कराड उत्तरच्या रखडलेल्या विकासावर लक्ष केंद्रित करत शामगावसह इतर गावांचा पाणीप्रश्न भाजप – महायुती सरकारने सोडवल्याचे सांगितले.
80 टक्के मतदान देण्याचा निर्धार :
शामगावचा पाणी प्रश्न सुटला, तर येथील बेरोजगार युवा वर्ग शेतकरी, उद्योजक होईल, असा विश्वास व्यक्त करत डॉ. सचिन पोळ म्हणाले, महायुतीचं शामगावचा पाणी प्रश्न सोडवू शकते. हे गावकरी ओळखून असून शामगावातून मनोजदादांना 80 टक्के मतदान देणार असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.






