कराड दभिणमधील भाजपाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या:आमदार डॉ. अतुलबाबा भोसले

कराड दभिणमधील भाजपाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या:आमदार डॉ.अतुलबाबा भोसले
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
भाजपा सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघात अभूतपूर्व विकास झाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपचे नेतृत्व आल्यास विकासाला आणखी गती मिळेल. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी कराड दभिणमधील भाजपाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. कोळे (ता. कराड) येथे आयोजित भाजपा उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
भाजपाच्या विंग जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सौ. शैलजा शिंदे, कोळे पंचायत समिती गणाचे उमेदवार अर्जुन कराळे आणि विंग पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. नंदाताई यादव यांच्या प्रचाराचा शुभारंभ आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते श्री दत्त मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. व्यासपीठावर उमेदवारांसह माजी आमदार आनंदराव पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, सचिन पाचपुते, पांडुरंग सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ.डॉ. भोसले म्हणाले, की कोळे गावाची ओळख ही कायम भारतीय जनता पार्टीला आघाडी देणारे गाव म्हणून राहिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मजबूत विचारधारा इथे रुजलेली आहे. विंग जिल्हा परिषद गटामध्ये गेल्या ५० वर्षांत जेवढा विकास निधी मिळाला नाही, तेवढा निधी भाजपा सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करुन देता आला, याचे मला समाधान आहे. केंद्रात पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप अशी ही तिन्ही ठिकाणी मजबूत साखळी निर्माण झाल्यास गावांचा विकास कुणीही थांबवू शकणार नाही. म्हणूनच आपापसातील मतभेद विसरुन, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाचे उमेदवार प्रचंड मताधिक्यांनी निवडून आणावेत.
माजी आमदार आनंदराव पाटील म्हणाले, आमदार झाल्यानंतर अतुलबाबांनी या मतदारसंघात विकासाचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. अतुलबाबा भोसले हे संपूर्ण जिल्ह्यात एक विश्वासाचे नेतृत्व बनले आहे. आता पुढचा टप्पा सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष, कराड पंचायत समितीवर भाजपचा सभापती आणि गटागणात भाजपचे सदस्य निवडून आणण्याचा आहे. हे साध्य करायचे असेल तर या तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणे ही आपली जबाबदारी आहे.
श्रीरंग देसाई म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेबांचा आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यावर प्रचंड विश्वास असून, त्यांना भक्कम पाठबळ देण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना विजयी करा.
पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य हे आमदारांचे खरे विश्वस्त असतात. हे विश्वस्त जर भाजपचे असतील, तर आमदार अधिक ताकदीने मतदारसंघासाठी निधी आणू शकतात. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपच्या तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन सचित पाचपुते यांनी केले.
यावेळी उमेदवार सौ. शैलजा शिंदे, अर्जुन कराळे आणि सौ. नंदाताई यादव यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी घारेवाडी येथील गौरव घारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.
सभेला जयवंत माने, विलास यादव, के. पी. यादव, मलकापूरचे नगरसेवक सुरज शेवाळे, आणे गावचे सरपंच किसन देसाई, सागर पाटील, सचिन देसाई, संजय तोडकर, विकास कदम, विनोद शिंगण, अमित माने, उमेश घारे, सुरेश घारे, धनाजी शिंदे, दादासाहेब कदम, मंगेश गरुड, सुनील पाटील, महादेव पाटील, उमेश खाडे, हेमंत पाटील यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






