
जनकल्याण पतसंस्था कराडची भक्कम आर्थिक स्थिती : अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
संस्थेने या संपलेल्या आर्थिक वर्षात आपल्या व्यवसायाचा चढता आलेख कायम ठेवण्यात यश मिळविले आहे. आपल्या व्यावसायिक वाटचालीत सातत्य कायम ठेवत असताना दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाअखेर रु.९३८ कोटींच्या संमिश्र व्यवसाय केला आहे. गतवर्षाच्या तुलनेने एकुण व्यवसायात रु.२५ कोटीने वृध्दी झाली आहे. मार्च अखेर रक्कम रु.५५७ कोटींच्या ठेवी संस्थेकडे जमा झाल्या असून रुपये ३८१ कोटी इतके कर्ज वितरण केले आहे. संस्थेने विविध बँकामधून रु.२५३ कोटीची सुरक्षित गुंतवणूक केलेली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर देशपांडे यांनी दिली. व्यावसायिक तीव्र स्पर्धेतही बाजारपेठेतील सकारात्मक हालचालींचा संस्थेच्या कामकाजात नियोजनबध्द उपयोग करुन, तसेच प्रभावी कर्ज वसूली या जोरावर संस्थेचा नक्त एन.पी.ए ३.९६ टक्के इतका आहे.
संस्थेस संपलेल्या आर्थिक वर्षात रु.७.७० कोटींचा नक्त नफा झाला आहे. सदर नफ्यात आर्थिक वर्ष २०२३-२४ पेक्षा निश्चित वाढ झालेली आहे.
संस्थेने सभासदांसाठी अद्यावत तंत्रज्ञानावर आधारित विविध सेवा सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. यामध्ये युटिलिटी पेमेंटस्, फास्टॅग, क्यू.आर.कोड, टॅक्स पेमेंट कलेक्शन याचबरोबर आर.टी.जी.एस., एन.ई.एफ.टी, प्रीपेड डेबीट कार्डचा समावेश होतो. या सुविधांचा संस्थेच्या सभासदांना मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहे. संस्थेने ग्राहकांसाठी मोबाईल बँकींग सुविधा सुध्दा उपलब्ध करुन दिली आहे.
विमा व्यवसायामधील संस्थांबरोबर व्यावसायिक करार करुन जनरल इन्शुरन्स अंतर्गत वाहन, फायर, मरीन, इंडस्ट्रीअल व हेल्थ इन्शुरन्स व लाईफ इन्शुरन्स अंतर्गत टर्म इन्शुरन्सचा संस्था व्यवसाय करत आहे. या व्यवसायांतर्गत असलेल्या योजनांचा संस्थेच्या अनेक सभासदांनी लाभ घेतलेला आहे व समाधान व्यक्त केले आहे.
संस्थेने नियमित कर्ज परतफेड करणा-या कर्जदारांना सलग बारा वर्षे प्रोत्साहनपर व्याजदरात १ टक्का पर्यंत या प्रमाणे रु.८ कोटी इतका रिबेट दिलेला आहे. त्याचा नियमित कर्जदारांना निश्चितच लाभ झालेला आहे. सन २०२४-२५ या संपलेल्या आर्थिक वर्षात नियमित कर्ज भरणा-या कर्जदारांच्या रिबेटची रक्कम लवकरच त्यांच्या सेव्हिंग्ज, चालू खाती जमा होईल. रिबेट देण्याचे संचालक मंडळाचे हे धोरण पुढे ही सातत्याने ठेवले जाईल. २०२५-२६ यावर्षी देखील आपली कर्ज खाती नियमित ठेवून रिबेट योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष श्री.अभिजीत चाफेकर यांनी यावेळी केले.
आर्थिक वर्ष २०२५-२६ हे अजूनही आव्हानात्मक असणार आहे, याची संस्थेच्या संचालक मंडळास जाणीव असून या आव्हानांचा सक्षमपणे सामना करणेस जनकल्याण पतसंस्था सिध्द असल्याचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर देशपांडे यांनी सांगीतले. मागील वर्षामध्ये संस्थेच्या सभासदांनी संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेतल्याबद्दल व संस्थेवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्व सभासदांचे अध्यक्षांनी आभार मानले. चालु आर्थिक वर्षाकरिता संस्थेने रु.१००० कोटी व्यवसायाचे उध्दिष्ट ठेवले आहे. ते लवकरात लवकर पूर्ण होणेकरीता सर्व सभासदांनी संस्थेशी जास्तीत जास्त व्यवहार करुन संस्थेस सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री अभिजीत चाफेकर, संचालक डॉ.प्रकाश सप्रे, डॉ.अविनाश गरगटे, सीए शिरीष गोडबोले, श्री.एकनाथ फिरंगे, श्री.जितेंद्र शहा, श्री.हिंदुराव डुबल, श्री.मोहन सर्वगोड, डॉ.सुचिता हुद्देदार, सौ.वर्षा कुलकर्णी, श्री दिपक जोशी, श्री प्रविण देशपांडे, श्री सुनील कुलकर्णी, सीए. आशुतोष गोडबोले, श्री. अशोक आटकर व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विनायक फडके हे उपस्थित होते.