जीवनशैलीव्यवसाय

कराड अर्बनने व्यवसायाचा पाच हजार कोटींचा टप्पा ओलांडला : डॉ. सुभाष एरम

कराड अर्बनने व्यवसायाचा पाच हजार कोटींचा टप्पा ओलांडला
डॉ. सुभाष एरम; व्यवयात 435 कोटींची वाढ, एन.पी.ए. शून्य टक्के राखण्यात यश
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
कराड अर्बन बँकेने व्यवसायाचा पाच हजार कोटींचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. गतवर्षाच्या तुलनेत बँकेने व्यवयात 435 कोटींची घसघशीत वाढ नोंदवत मार्च 2024 अखेरचा बँकेचा व्यवसाय 5186 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्याचबरोबर बँकेने कामगिरीत गुणात्मकता टिकवत नक्त एन.पी.ए. ‘शून्य’ टक्के राखण्यात यश मिळवले आहे. बँकेच्या शतकोत्तर वाटचालीत या दोन ऐतिहासिक घटना एकाच आर्थिक वर्षात घडल्या असून आणखी एका सुवर्णपानाची नोंद बँकेच्या इतिहासात झाली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी दिली.
डॉ. एरम म्हणाले, गत आर्थिक वर्षात वसुली प्रक्रियेवर भर देऊन नक्त एन.पी.ए.चे प्रमाण तीन टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवले होते. वसुली गतिमान ठेवून नेट एन.पी.ए.चे प्रमाण शून्य टक्के राखणे, पाच हजार कोटींचा व्यवसाय साध्य करण्याचे ध्येय वर्षाच्या सुरुवातीसच निर्धारित केले होते. व्यवसाय वाढ व वसुलीत सातत्य ठेवत सेवकांनीदेखील अत्यंत सूक्ष्मस्तरावर नेटके नियोजन, प्रभावी अंमलबजावणी केल्याने हे दुहेरी यश एकाच आर्थिक वर्षात साध्य करता आले. मार्च 2024 अखेरच्या सांपत्तिक स्थितीचा विचार करता, ठेवी 3262 कोटी, कर्जे 1924 कोटींपर्यंत पोहोचली असून एकूण व्यवसाय 5186 कोटी झाला आहे. बँकेला करपूर्व ढोबळ नफा 55 कोटी, तर कर व तरतुदीनंतर निव्वळ नफा 24 कोटी 21 लाख, निव्वळ एन.पी.ए.चे प्रमाण शून्य टक्क्यांपेक्षा कमी करण्यात मिळालेले यश बँकेची आर्थिक सक्षमता व भक्कमपणा विस्तारत असल्याचे द्योतक आहे.
रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेनुसार विलीनीकृत अजिंक्यतारा बँकेच्या 10 शाखांचे रिलोकेशन करण्यात आल्याने बारामती, सोलापूर, लोणंद, रत्नागिरी, पुसेसावळी, पलूस, जयसिंगपूर, नागाळा पार्क कोल्हापूर, तळमावले, नन्हे (पुणे) या नवीन ठिकाणी बँक ग्राहकांच्या सेवेत रुजू झाली. केवळ सहा महिन्यांच्या कार्यकाळात या १० शाखांनी 100 कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला. तसेच, रिझर्व्ह बँकेने नव्या वाई, बार्शी, सांगोला, पंढरपूर व एम.आय.डी.सी. सातारा या पाच शाखांना मान्यता दिली असून लवकरच त्या ग्राहकसेवेत रुजू होतील. महाराष्ट्रातील तालुका पातळीवर स्थापन झालेली आणि पाच हजार कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार करणारी कराड अर्बन बँक ही एकमेव सहकारी बँक आहे. पूर्णपणे व्यावसायिक व्यवस्थापनाचा अंगीकार बँकेने केल्यामुळेच ही प्रगती साध्य करणे शक्य झाले, असे प्रतिपादन ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी यांनी केले.

बँकेच्या स्वभांडवलाचा पाया दिवसेंदिवस मजबूत व विस्तृत होत असून चालू वर्षात भांडवल पर्याप्तता प्रमाण (सी.आर.ए.आर.) 16.16 टक्के राखली आहे. बँकेस एकूण 55 कोटींचा ढोबळ नफा, तर सर्व कर व तरतुदी वजा जाता 24.21 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेच्या 26 शाखांना एक कोटींपेक्षा अधिक नफा झाला असून यामध्ये सर्वाधिक नफा मिळालेल्या शाखेने सहा कोटींचा उच्चांकी टप्पा ओलांडला आहे. तसेच, 24 शाखांनी एन.पी.ए.चे प्रमाण ‘शून्य’ राखण्यात यश मिळवले आहे, अशी माहिती बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी यांनी दिली.
गेल्या दोन वर्षांपासून वसुलीबरोबरच व्यवसायवाढीचे उद्दिष्ट गाठणे आव्हानात्मक होते. गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात सेवकांना दिलेली उद्दिष्टे त्यांनी नियोजनानुसार पूर्ण केली. अग्रक्रम क्षेत्रासाठीचे कर्जपुरवण्याचे प्रमाणदेखील पूर्ण झाले असून रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकष व प्रमाणकांची पूर्तता बँकेने केली आहे. भविष्यकालीन वाटचालीतदेखील शून्य टक्के एन.पी.ए. कायम राखणे, व्यवसावाढीत सातत्य ठेवत वाटचाल आणि बँकेचा महाराष्ट्रभर विस्तार करणे हेच आमचे प्रमुख ध्येय राहील, असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी सांगितले.
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळ सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »