जीवनशैली

उंडाळेत साखळी उपोषणस्थळी हरिनामाचा गजर, मराठा आरक्षणासाठी तीन आठवड्यांपासून उपोषण; भागातील गावांचा उत्स्फूर्त सहभाग

उंडाळेत साखळी उपोषणस्थळी हरिनामाचा गजर
मराठा आरक्षणासाठी तीन आठवड्यांपासून उपोषण; भागातील गावांचा उत्स्फूर्त सहभाग
कराड:ग्राम दौलत न्यूज नेटवर्क-
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सकल मराठा समाज, उंडाळे विभागातर्फे तीन आठवड्यांपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. सदर उपोषणात रविवारी भागातील शेवाळेवाडी (जिंती), बागलवाडी आणि आकाईचीवाडी ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. तसेच येथील भजनी मंडळांनी भजन करून उपोषणस्थळी हरिनामाचा गजर केला.
सकल मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून 50 टक्क्यांच्या आत आरक्षण मिळावे, यासाठी मराठा क्रांतीसुर्य मनोज जरांगे-पाटील यांनी लढा उभारला आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी, तसेच सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यभरातील गावागावात साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार उंडाळे, ता. कराड येथे सकल मराठा समाज, उंडाळे विभागातर्फे तीन आठवड्यांपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या उपोषणात दररोज उंडाळे भागातील प्रत्येक गावातील ग्रामस्थ एकेक दिवस सहभागी होतात. रविवार, दि. 26 रोजी भागातील शेवाळेवाडी (जिंती), बागलवाडी आणि आकाईचीवाडी ग्रामस्थांनी साखळी उपोषणात सहभाग नोंदवला. तसेच रविवारी रात्री शिवशंभो भजनी मंडळ, शेवाळेवाडी (जिंती), जय हनुमान भजनी मंडळ (बागलवाडी) आणि महादेव भजनी मंडळ, आकाईचीवाडी यांनी भजन सेवा करत उपोषणस्थळी हरिनामाचा गजर केला.
यामध्ये आकाईचीवाडीचे सरपंच महावेद वाळके, शामराव पाटील पतसंस्थेचे संचालक आनंद माने, लालासो वडकर, बजरंग चिकले, बागलवाडीचे शहाजी देसाई, बाजीराव बागल, चंदर बागल, तसेच शेवाळेवाडीचे (जिंती) अशोक शेवाळे, भगवान शेवाळे, संदीप शेवाळे, काकासो शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण शेवाळे, दिलीप शेवाळे यांनी सहभाग घेतला.
यावेळी उंडाळेसह परिसरातील ग्रामस्थ, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहाजी देसाई यांनी प्रास्ताविक केले. आकाईचीवाडीचे सरपंच महावेद वाळके यांनी सूत्रसंचालन केले. भगवान शेवाळे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »