क्रिडामहाराष्ट्र

धाराशिवमध्ये नोव्हेंबर महिन्यात घुमणार ‘महाराष्ट्र केसरी’चा शड्डू

धाराशिवमध्ये नोव्हेंबर महिन्यात घुमणार ‘महाराष्ट्र केसरी’चा शड्डू
मुंबई : ६५ व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धांचा थरार धाराशिवमध्ये रंगणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने ही घोषणा केली आहे. यावर्षी १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान यंदा पहिल्यांदाच धाराशिव जिल्ह्याला मिळाला असून ही स्पर्धा एकूण पाच दिवस चालणार आहे. धाराशिव जिल्हा कुस्ती तालीम संघ आणि आदर्श शिक्षक प्रसारक मंडळ या स्पर्धेचं आयोजन करणार आहेत.
गतवर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात पार पडली होती. पंचांच्या निर्णयामुळे त्या स्पर्धेची बराच काळ चर्चा सुरु राहिली होती. आता यंदा धाराशिव जिल्ह्याला पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजन करण्याचा मान मिळाला आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजूर झाल्यानंतर याची आज घोषणा करण्यात आली आहे. तुळजाभवानी क्रीडा संकुलाच्या मैदानावर १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार ५ दिवस चालणार आहे. या स्पर्धेत ४५ वेगवेगळे जिल्हा संघ सहभागी होणार आहेत. त्यातून ४५० खेळाडू माती आणि ४५० खेळाडू गादी गटात असे ९०० खेळाडू सहभागी होतील.माती आणि गादी असे २० वेगवेगळ्या वजनी गटात ही स्पर्धा होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे.महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अंदाजे २ कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम बक्षीस चांदीची मानाची गदा आणि ३० लाख रुपये किमतीची स्कार्पिओ एन गाडी तर द्वितीय बक्षीस महिंद्रा ट्रॅक्टर दिले जाणार आहे. २० गटात होणाऱ्या प्रत्येक गटातील प्रथम येणाऱ्याला बुलेट व रोख पारितोषिक दिले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »